केंद्र सरकारच्या पाच योजना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
केंद्र आणि राज्य सरकार सामान्य नागरिकांचं जीवन सुलभ व्हावं, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत मिळावी म्हणून अनेक योजना राबवत असते. यातच आज आपण केंद्र सरकारच्या अशाच पाच योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
1. सुकन्या समृद्धी योजना :
पैशांअभावी आपल्या मुलांना शिक्षण देऊ न शकलेल्या कुटुंबांच्या, विशेषत: मुलींच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली.देशातील मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी जानेवारी 2015 मध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चासाठी पैसे वाचवू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावर उघडले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात मॅच्युर होते. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर या खात्यातून अभ्यासासाठी पैसे काढता येतात. मात्र संपूर्ण रक्कम 21 वर्षानंतरच काढता येते.
2. उज्ज्वला योजना:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे ही योजना सुरू केली.
जे लोक कोळसा, झाड्याच्या फांद्या इत्यादी पारंपारिक स्वयंपाक इंधन वापरत होते त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना सरकारने सांगितले की, पारंपरिक स्वयंपाकाच्या इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही घातक परिणाम होतात. यासाठीही योजना सुरु करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकता.
3. पीएम किसान सन्मान निधी:
या योजनेचा लाभ अल्प व अत्यल्प शेतकरी कुटुंबांना (ज्यांना दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे) मिळतो. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना सरकार दरवर्षी सहा हजार रुपये देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
4. आयुष्मान भारत
ही आरोग्य विमा योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गरीब वर्गातील कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो. गरीब बीपीएल कार्डधारकांना मोफत उपचार मिळावेत हा यामागचा उद्देश आहे. देशभरात अशी बीपीएल कार्ड धारक गरीब कुटुंबांची संख्या सुमारे 10 कोटी आहे. तर 50 कोटी लोक याचा लाभ घेऊ शकतील.
5. प्रधानमंत्री आवास योजना:
ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. या अंतर्गत ज्या लोकांकडे कच्ची घरे आहेत, ज्यांना छप्पर नाही, ते पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत गरिबांना घरे बांधण्यासाठी पैसे दिले जातात. याशिवाय कमी उत्पन्न असलेल्यांना गृहकर्ज अनुदानही दिले जाते. 25 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा