२०२४-२५ पासून पाचवी अन् आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याचे बंधन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा होते, पण पहिली ते आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही, असे धोरण 'आरटीई' अंतर्गत २०१० पासून सुरू आहे.
आता त्यात बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्याथ्यांना वार्षिक परीक्षा पास व्हावीच लागेल, अन्यथा त्यांना नापास झाल्याने त्याच वर्गात बसावे लागणार आहे. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश काढले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने 'आरटीई' अॅक्ट लागू करताना पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे २०१० पासून इयत्ता पर्यंत पहिली ते आठवीतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. पण, पुढे जाऊन अनेक विद्यार्थी इयत्ता दहावी, बारावीत अभ्यासक्रमात पिछाडीवर राहिले आणि अनेकांनी मधूनच शाळा देखील सोडल्याची उदाहरणे समोर आली.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान असे विषय विस्तृतपणे समजावेत या हेतूने आता इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. पण, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार आहे.
नापास झालेल्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात जाता येणार नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपत्रिकांचा नमुना तयार करण्यात आला आहे. त्या धर्तींवर शाळांना प्रश्नपत्रिका काढाव्या लागणार आहेत.
वार्षिक परीक्षे नंतर ३० दिवसांत पुन्हा संधी
इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे, एक महिन्यानंतर त्यांची पुन्हा एकदा शाळास्तरावर परीक्षा होईल. त्यावेळी जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील, त्यांना नव्या शैक्षणिक वर्षापासून पुढील वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे.
नापास विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे, असा नवा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षांपासूनच्या नवीन बदलानुसार पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. दुसरी संधी देऊनही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांना उत्तीर्ण होईपर्यंत त्याच वर्गात बसावे लागेल.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा