हट्टी मुलांना हाताळायचं कसं?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुलांच्या विकासासाठी मग तो शारीरिक असो किंवा मानसिक त्यांना पालकांकडून प्रेम, काळजी, संरक्षण, वेळ, त्यांनी केलेली प्रशंसा, कौतुक अशा गोष्टी हव्या असतात. जर वेळच्या वेळी या गोष्टी पालकांकडून मुलांना दिल्या जात असतील तर मुलांचं भावविश्व स्थिरावलेलं असतं. पण या गरजा जर पूर्ण होत नसतील आणि मुलं हट्ट करत असतील तर ती धोक्याची घंटा मानायला हवी.
मुलांनी वयाप्रमाणे हट्ट करणं यात चुकीचं काहीच नाही. पण टोकाचा हट्ट मुलांनी करणं, पालकांना तो हट्ट पुरवता न येणं, यामुळे पालकांचा आरडाओरडा आणि मुलांची रडारड असं चित्र अनेकदा बघायला मिळतं. अशा हट्टी मुलांशी कसं वागायचं? त्यांच्याशी डील कसं करायचं हे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नाही आणि मग मुलांच्या हट्टाला बळी पडून किंवा चारचौघांमध्ये होणारी शोभा टाळण्यासाठी मुलांचे हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
अनेक पालकांनाही हाच प्रश्न पडतो की हट्टी मुलांना हाताळायचं कसं?
मुलं टोकाची हट्टी असली की पालकांचाही रागाचा पारा चढतो. पालकांना वाटते की आपला आवाज वाढवला तर मूल दबेल. पण होतं उलटंच. हट्टी मुलं पेटून उठतात. पालकांना जे समजून सांगायचं ते बाजूलाच राहातं आणि पालक-मुलांमधे नवीनच भांडण सुरु होतं. हे टाळण्यासाठी
१) मुलं हट्ट करत असतील तेव्हा पालकांनी शांत राहण्याचं धोरण स्वीकारावं. त्यांच्याशी प्रेमाच्या सूरात बोलावं. त्यांच्याशी समजुतीनं वागून काय बरोबर काय चूक यातला फरक शांततेनं समजून सांगावा. मुख्य म्हणजे आपल्या म्हणण्यावर ठाम राहावे.
२) हट्टी मुलं अनेकदा वाद घालायला लागतात. अशा वेळेस पालकांनीही या वादात उडी घेतली तर मुलांना नेहेमी वाद घालण्याची सवय लागते. यासाठी मुलं हट्ट जरी करत असली तरी आधी पालकांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायला हवं. आपले आई वडील आपलं शांतपणे ऐकून घेत आहेत असं बघितल्यावर मुलांचा चढलेला आवाज खाली येतो.
३) मुलंही आई बाबा जेव्हा बोलतात तेव्हा वाद न घालता ऐकून घेण्याचा प्रयत्न करता. हे वारंवार व्हायला लागलं की काही काळानं मुलांचा हट्ट कमी व्हायला लागतो.
४) मुलांना बोलण्याचा, आपल्या भावना पूर्णपणे व्यक्त करण्याएवढा वेळ पालकांनी द्यायला हवा.
५) आपल्याला जे सांगायचंय ते मुलांचं पूर्ण बोलून झाल्यावर सांगावं. यामुळे आई बाबा आपलं ऐकतात तसं आपणही आई बाबांचं ऐकून घ्यायला हवं याची जाणीव हळूहळू मुलांना व्हायला लागते.
६) वयात येणाऱ्या मुलांचा हट्टीपणा अनेकदा टोकाचा असतो. अशावेळी पालकांची अधिक पंचाईत होते कारण हट्ट पुरवला तर त्या हट्टीपणाला प्रोत्साहन दिल्यासारखं होतं आणि नकार दिला तर मुलांची चिडचिड सहन करावी लागते. ‘नाही’ हा शब्द ऐकण्याची आणि तो पचवण्याची मानसिकता तयार करणं अनेकदा अवघड बनतं. यासाठी लहानपणापासून नकार पचवायला मुलांना शिकवायला हवा.
७) आम्हाला मिळालं नाही म्हणून आमची मुलं मागेल ते देऊ ही पालकांची मानसिकताच हट्टीपणाला खतपाणी घालणारी असते. याकडे पालकांनीही वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तसं झालं तर पालकत्व सुसह्य होईल.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा